कृषी विभागातील विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षांमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्त्यांची ‘गुड न्यूज’ मिळण्याची शक्यता आहे. मंत्रालयस्तरावर तसा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून, त्यातून १९८ अधिकाऱ्यांना नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. नव्याने होणाऱ्या पदस्थापनेमुळे कृषी विभागाच्या कामकाजात अधिक गतिमानता आणि बळकटी येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी विशेषतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नव्याने नियुक्त्या आणि पदस्थापना दिली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तालुका कृषी अधिकारी पदाचे (टीएओ) ६०, उपविभागीय कृषी अधिकारी पदाचे (एसडीओ) १७ आणि कृषी अधिकारी पदांचे (एओ) १२१ मिळून १९८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर येत्या आठवडाभरात निर्णय अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कृषी विभागात सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांमधूनही बढत्यांचे प्रस्ताव मंत्रालयस्तरावर प्रलंबित आहेत. अनेक ठिकाणच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व अन्य पदभार कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे देऊन कामकाज सुरू आहे. त्या पदोन्नत्यांमधून २१ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी उपंसचालक ४५, तालुका कृषी अधिकारी १२३ आणि १६८ कृषी अधिकारी मिळून एकूण ३५७ अधिकाऱ्यांना बढती मिळणे अपेक्षित आहे. त्यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे व कृषीचे प्रधान सचिव् अनुप कुमार यांच्याकडून या दोन्ही निर्णयांवर शिक्कामोर्तब अपेक्षित मानले जात आहे.